माझा भाजप मध्ये जबरदस्तीने प्रवेश करून घेतला - अक्षय खताळ
जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्यासह भाजप पडली तोंडावर
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भाजप विरुध्द महाविकास आघाडी असे राजकारण सुरुये. आता हे फोडाफोडीचे राजकारण पक्षीय पातळीवर देखील आले आहे. मोहोळ तालुक्यातील युवक नेते अक्षय खताळ यांचा भाजप प्रवेश झाल्या फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. खताळ यांना भाजप ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष पद दिल्याचे देखील जाहीर झाले. मात्र आता खताळ यांनी घुमजाव केले आहे. भाजप प्रवेशासाठी माझ्यावर जबरदस्ती करण्यात आली. काही पत्रकारांनी मला भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्याशी फोनवरून संपर्क करून दिला. आणि पत्रकारांनीच माझा प्रवेश घडवून आणल्याचा खळबळजनक आरोप अक्षय तानाजी खताळ यांनी पत्रकार परिषदेत केला.आज सोलापूरात खताळ यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप प्रवेशाचा खुलासा केला. तसेच आपण राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करत असल्याचे जाहीर केले.यावेळी आमदार यशवंत माने, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे, माजी आमदार राजन पाटील, जिल्हा परिषद सदस्य बाळराजे पाटील, नगरसेवक महेश कोठे, नगरसेवक दिलीप कोल्हे उपस्थित होते.खताळ यांनी आपल्यावर भाजप प्रवेशासाठी जबरदस्ती केल्याचा आरोप केला. त्यामुळे भाजप विरोधी पक्षाच्या नेत्यांना फोडाफोडी करण्यासाठी जबरदस्ती करत असल्याचे उघड झाले आहे. तसेच यामध्ये काही पत्रकार देखील सामील असल्याच्या दाव्याने या प्रकरणाला नवे वळण प्राप्त झाले आहे.आपले वडील स्व. तानाजी खताळ हे देखील माजी आमदार राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करत होते आणि आता आमचे कुटुंब देखील त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करत असल्याचे जाहीर करून भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्यासह भाजपला तोंडावर पाडले आहे.
No comments:
Post a Comment