विस्थापीत मजूर व विनाशिधापत्रिकाधारकांना मोफत तांदूळ व अख्खा चना वाटप करण्यास मुदतवाढ |
शिधावाटप नियंत्रक कैलास पगारे यांची माहिती
मुंबई दि.3(क.वृ.): विस्थापीत मजूर व विनाशिधापत्रिकाधारकांना मोफत तांदूळ व अख्खा चना वाटप करण्यास 10 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती शिधावाटप नियंत्रक व मुंबईचे नागरी पुरवठा संचालक कैलास पगारे यांनी दिली.
लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्र शासनाच्या आत्मनिर्भर भारत वित्तीय सहाय्य पॅकेजअंतर्गत केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने अंतर्गत तसेच कोणत्याही राज्य योजनेमध्ये समाविष्ट नसलेल्या विनाशिधापत्रिकाधारकांना माहे मे व जून 2020 या दोन महिन्याच्या कालावधीकरीता प्रतिव्यक्ती प्रतिमाह 5 किलो मोफत तांदूळ वितरीत करण्यात येत असून त्याकरीता पात्र लाभार्थ्यांचे निकष खालीलप्रमाणे ठरवून देण्यात आलेले आहेत.
I.राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेमधील शिधापत्रिकेसाठी अर्ज केला आहे, परंतु अद्यापपर्यंत शिधापत्रिका प्राप्त न झालेले व्यक्ती.
II.अन्न धान्याची गरज असलेले सामाजिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विस्थापित मजूर, रोजंदारी मजूर.
III.शासनाच्या दिनांक 24.04.2020 रोजीच्या पत्रान्वये प्रलंबित असलेले सर्व शिधापत्रिकाधारक
IV.राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना तसेच इतर राज्य योजनेतील शिधापत्रिकाधारक यातून पूर्णपणे वगळण्यात येतील.
सदर निकषात बसणाऱ्या लाभार्थ्यांच्या याद्या महानगरपालिका व कामगार विभागाच्या मदतीने तयार करून घेण्यात आलेल्या आहेत.
मुंबई/ठाणे शिधावाटप यंत्रणेतील उपरोक्त निकषात बसणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना संबंधित विभागाच्या शिधावाटप अधिकारी यांचे कार्यालयामार्फत निश्चित करण्यात आलेल्या केंद्रामधून माहे मे 2020 करिता प्रतिव्यक्ती 5 किलो मोफत तांदळाचे वितरण दिनांक 29 मे 2020 रोजी पासून सुरू करण्यात आले आहे. तसेच माहे जून 2020 करीता सुद्धा सदर योजनेअंतर्गत मोफत तांदळाचे वितरण सुरू आहे. आतापर्यंत 1058 मे.टन मोफत तांदळाचे वितरण करण्यात आलेले आहे. तसेच सदर योजने अंतर्गत माहे मे आणि जून या महिन्याकरीता प्रतिकुटुंब प्रतिमाह 1 किलो मोफत अख्खा चण्याचे वाटप सुरू आहे.
सदर योजनेतील लाभार्थ्यांना मे व जून या दोन महिन्याच्या मोफत तांदळाचे व मोफत अख्खा चण्याचे वितरण करण्यास दिनांक 10 जुलै 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून याबाबत सर्व संबंधितांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. अन्नधान्याचा मुबलक साठा उपलब्ध असल्यामुळे निकषात बसणाऱ्या पात्र लाभार्थ्यांनी निश्चित करण्यात आलेल्या केंद्रामधून कोणतीही गर्दी न करता योजनेतील धान्य सोशल डिस्टन्सिंगचा वापर करून तसेच मास्कचा वापर करून लवकरात लवकर प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
0 Comments