वर्धा जिल्ह्याची वाटचाल कोरोना मुक्तीकडे ! |

वर्धा, दि. २२ : राज्यातच नव्हे तर देशात कोरोनाविरोधातील लढाई नेटाने लढली जात असताना या संघर्षातील वर्धा जिल्ह्याची यशोगाथा संपूर्ण देशासाठी प्रेरक आणि मार्गदर्शक ठरली आहे. सध्या या जिल्ह्यात केवळ एकच सक्रिय रुग्ण आहे. राज्यात कोरोनाची लागण झाल्यानंतर तब्बल पन्नास दिवस त्याला रोखण्यात यश मिळवणाऱ्या वर्धा जिल्ह्यात आतापर्यंत केवळ तेरा रुग्ण आढळले. त्यापैकी एकाचा मृत्यू होऊन इतर सर्व बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण तब्बल ८५ टक्के इतके लक्षणीय असून यासंदर्भात वर्धा जिल्हा प्रशासनाने एक मोठे यश मिळवले आहे.
इतर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू होण्यापूर्वीच वर्धा जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्याच्या २ तारखेला महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात चीनच्या बीजिंग शहरातून १३ विद्यार्थिनी शिक्षणासाठी आल्या होत्या. त्यावेळी जगात केवळ चीनमध्येच या विषाणूचा संसर्ग झालेला होता. विद्यापीठ प्रशासनाने या विद्यार्थिनींची जिल्हा प्रशासनाला माहिती देताच त्यांना विद्यापीठाच्या वसतिगृहातच विलगीकरण केले गेले. विलगीकरणाच्या कालावधीत त्यांच्यावर काटेकोर लक्ष ठेऊन त्यांना बाहेर फिरण्यास प्रतिबंध करण्यात आला. या घटनेनंतर जिल्हा प्रशासन अतिशय सजग व सक्रिय झाले.
परदेशातून आलेल्या व्यक्तींची माहिती मिळण्यासाठी नागरिकांनी स्वतःहून पुढे येऊन माहिती देण्याचे जाहीर आवाहन केले. परदेशातून आलेल्या लोकांनी गृह विलगीकरण गांभिर्याने पाळावे यासाठी काहींवर दंडात्मक कारवाई सुद्धा करावी लागली. यामध्ये एका व्यावसायिकाचे दुकान सील करण्याची कारवाई ही राज्यातील पहिलीच ठरली.
गर्दीच्या ठिकाणी हँड वॉश स्टेशन
हात धुण्याबाबत जनजागृती आणण्यासाठी मुख्य बाजारात गर्दीच्या ठिकाणी हँड वॉश स्टेशनची उपलब्धता करून दिली. यासाठी सामाजिक संस्था आणि व्यापारी वर्गाने सहकार्य केले. जिल्हाबंदी झाल्यानंतर जिल्ह्यात प्रवेश करणारे मुख्य १६ मार्ग आणि नदी, नाले, गावमार्ग, एका गावातून दुसऱ्या गावात निघणारे छोटे ९६ असे ११२ मार्गांवर २४ तास निगराणी पथक नेमण्यात आले. यामध्ये, होमगार्ड, पोलीस, शिक् षक आणि इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांची सेवा घेण्यात आली. परवानगी नसलेल्या लोकांवर चोर मार्गाने प्रवेश केल्यावर कारवाई सुद्धा करण्यात आली.
गर्दीच्या भाजीबाजाराचे स्थलांतर
भाजी बाजार हे सर्वात गर्दीचे ठिकाण. सोशल डिस्टन्सिंगचा इथे फार अवलंब होत नाही. त्यामुळे प्रशासनाने सुरुवातीलाच गर्दीचे भाजी बाजार मोठ्या मैदानात स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला. १० नगर पालिका क्षेत्रातील असे बाजार आणि मोठ्या गावात भरणारे आठवडी बाजार मोठ्या मैदानात भरवल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा हा वर्धा पॅटर्न राज्यात चांगलाच दखलपात्र ठरला. यामध्ये रोटरीच्या सहकार्याने वर्धा शहरात सुरू केलेल्या आदर्श भाजी बाजाराची दखल देशपातळीवर घेण्यात आली. अनेक जिल्ह्यांनी या बाजाराचे अनुकरण केले.
अनलोडिंग पॉईंट
इतर जिल्ह्यातून जीवनावश्यक माल घेऊन येणाऱ्या ट्रकसोबत रोज १५ हजार लोकांचा थेट शहरात प्रवेश होत असल्याचे लक्षात येताच या ट्रकसाठी शहराबाहेरच अनलोडिंग केंद्र तयार करण्यात आले. तिथे ट्रक निर्जंतुकीकरणाची व्यवस्था, त्यासोबत येणाऱ्या वाहनचालक व सहाय्यक यांच्यासाठी तिथेच थांबण्याची व्यवस्था करण्यात आली. यासोबतच जिल्ह्यात इतर जिल्ह्यातून येणाऱ्या भाजीवर बंदी आणण्यात आली. केवळ बटाटे, अद्रक, लसूण व कांदे आणि जिल्ह्यात न पिकणारी फळे इतर जिल्ह्यातून मागविण्यात आली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पिकवलेला भाजीपाला जिल्ह्यात वापरण्यावर भर देण्यात आला.
संपूर्ण कुटुंब विलगीकरणाचा वर्धा पॅटर्न
५ मे नंतर अडकलेल्या नागरिकांना स्वगावी जाण्याची मुभा देण्यात आली. त्यावेळी जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या नागरिकांना संस्थात्मक विलगीकरणाऐवजी त्यांना गृह विलगिकरणाचा पर्याय देताना संपूर्ण कुटुंबाचे गृह विलगीकरण करण्यात आले. त्यांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी घरपोच सेवा देणाऱ्या दुकानदार आणि भाजी विक्रेत्यांचे दूरध्वनी क्रमांक असलेलं डीलिव्हर अँप तयार करण्यात आले. या व्यक्तींनी घराबाहेर पडू नये म्हणून त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी नोडल अधिकारी नेमण्यासोबतच सामाजिक संस्थांच्या सहकार्याने सोशल पोलिसिंगचा वापरही करण्यात आला. गृह विलगिकरणात असलेल्या साडेसात हजार लोकांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन 'घरी राहा, कोरोना योद्धा व्हा’ असा संदेश देणारी मोहीम राबवली. यात जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, पोलीस अधीक्षक डॉ बसवराज तेली, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सचिन ओंबासे यांच्यासोबतच लोकप्रतिनिधीनींही सहभाग घेतला. आजपर्यंत जिल्ह्यात ५० हजार लोकांनी प्रवेश केला आहे.
११५० सर्वेक्षण पथक
इतर जिल्ह्यातून आलेल्या लोकांना शोधण्यासोबतच घरोघरी तपासणी करण्याचे काम आरोग्य विभागाने चोख बजावले. यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ११५० आरोग्य सर्वेक्षण पथकाने आजपर्यंत १२ लक्ष लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे. यामध्ये सर्दी, खोकला या आजाराचे १२३० आणि सारीच्या १०८ रुग्णांवर तातडीने उपचार करून त्यांना पूर्ण बरे करण्यात या पथकाचा महत्त्वाचा वाटा आहे.
कंटेंमेंट झोनमध्ये सीसीटीव्ही कॅमेराची नजर
हिवरातांडा या गावातील एका महिलेचा ८ मे रोजी कोरोनाने मृत्यू झाला. ही वर्धेतील कोरोनाची पहिली केस होती. या रुग्णाचा कोरोना अहवाल १० मे रोजी आल्यावर हिवरातांडा गावासहित १० गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आली. मुख्य गाव असलेले हिवरातांडा येथे सीसीटीव्ही कॅमेराच्या साहाय्याने तेथील हालचालीवर नजर ठेवण्यात आली. त्यानंतर जिल्ह्यात आतापर्यंत १२ कोरोना रुग्ण आठळून आलेत. हे सर्वच इतर जिल्ह्यातून आलेले असून ११ कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्ण निघताच प्रतिबंधित क्षेत्र तयार करणे आणि तिथे कडक अंमलबजावणी करण्यासोबतच हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेराचा केलेला वापर वैशिष्ट्यपूर्ण ठरला.
रिकव्हरी रेट ८५ टक्के
सद्य:स्थितीत जिल्ह्यात सर्व व्यवहार सुरू आहेत. आणि प्रशासनही ‘ॲक्टिव्ह मोड’मध्ये काम करत आहे. जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढू नये म्हणून प्रशासन मास्कचा वापर, हात वारंवार धुणे आणि सामाजिक अंतर राखणे या त्रिसूत्रीवर काम करीत आहे. जिल्ह्यात राबवलेल्या विविध उपाययोजनांमुळे जिल्ह्यात आतापर्यंत १३ रुग्ण सापडले. यापैकी एका रुग्णाचा अहवाल येण्यापूर्वीच दुर्दैवाने मृत्यू झाला आणि इतर ११ रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर एकावर उपचार सुरु आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गातून बरे होण्याचा वर्धा जिल्ह्याचा रिकव्हरी रेट हा ८५ टक्के आहे. हा दर राज्याच्या दरापेक्षा ३६ टक्के अधिक तर देशाच्या दरापेक्षा २९ टक्के अधिक आहे.
जिल्ह्याने राबवलेल्या या उपाययोजनांमध्ये शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांसोबत नागरिकांचा सहभाग आणि सामाजिक संस्थांचे सहकार्य मोलाचे ठरले आहे.
0 Comments