गुणवत्तापूर्ण बी-बियाणे आणि खते मिळावे यासाठी कृषी विभाग दक्ष |
सातारा(क.वृ.):- जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण खते आणि बी-बियाणे मिळावे यासाठी शासन आग्रही असून यावर कृषी विभागाचे लक्ष आहे. प्रत्येक खत, बी-बियाणे विकणाऱ्या दुकानदारांनी आपल्या दुकानाच्या बाहेर दर्शनी भागात दररोज किती साठा आहे आणि दर काय आहेत ठळकपणे फलकावर लावावे अशा सूचना कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या.
सातारा जिल्ह्यच्या खरीप हंगाम आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार सर्वश्री महेश शिंदे, प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी शेखर सिंह, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष नितीन बानगुडे पाटील, कृषी विभागाचे कोल्हापूर विभागाचे सहसंचालक दशरथ तांबाळे, जिल्हा उपनिबंधक प्रकाश अष्टेकर, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत उपस्थित होते.
शेतकऱ्यांना वर्षभर पुरेल एवढा युरियाचा साठा जिल्ह्याला मिळेल मात्र शेतकऱ्यांनी पीक जोमात येते म्हणून अधिक खताचा मारा करू नये, त्यामुळे जमिनीचा पोत खराब होतो. योग्य ते प्रमाण वापरून उत्पादन कसे वाढेल याकडे लक्ष द्यावे असे सांगून नावीन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांना आम्ही प्रोत्साहन देत असल्याचे उदाहरणासह कृषीमंत्री श्री.भुसे यांनी यावेळी सांगितले.
सातारा जिल्ह्यातील एक शेतकरी जिरेनियम या सुंगधी लागवड वनस्पतीची लागवड करतो याची माहिती श्रीनिवास पाटील यांनी दिली आणि नैसर्गिक रंगाच्या शेतीला मोठा वाव आहे ही बाब महेश शिंदे यांनी निदर्शनास आणून दिली. या दोन्ही गोष्टी नाविन्यपूर्ण असून कृषीमंत्री म्हणून याबाबतीत काय करता येईल याचा सकारात्मक विचार करू असे यावेळी श्री.भुसे यांनी सांगितले.
शहरातील विद्यार्थ्यांना शेती आणि शेतकरी याबाबत फक्त पुस्तकी माहिती असते. त्यांचे प्रत्यक्ष जीवन पाहता यावे म्हणून येणाऱ्या काळात त्यांच्या सहली शेतात घेऊन जाण्याबाबत विचार करत आहोत, अशी माहिती कृषीमंत्री दादासाहेब भुसे यांनी यावेळी दिली.
यावेळी श्रीनिवास पाटील यांनी काही सूचना केल्या तर महेश शिंदे यांनीही कृषी विभागाचे काम उत्तम सुरु असल्याचे सांगून फुल शेती, हळद शेतकऱ्यांचे प्रश्न उपस्थित केले. त्यावर शासन पातळीवर योग्य निर्णय घेतले जातील, अशी ग्वाही कृषीमंत्री दादासाहेब भुसे यांनी यावेळी दिली.
कृषीमंत्री पोहोचले बांधावर
सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात ग्राम बीजोत्पादन अंतर्गत उत्पादित सोयाबीन बियाणे पेरणी केलेले उडतारे गावचे सुनील शंकर जगताप या शेतकऱ्याच्या प्लॉटला कृषीमंत्र्यांनी भेट दिली. यावेळी टोकण पद्धतीने सरीवर सोयाबीन पेरणी केल्याने एकरी फक्त १५ किलो बियाणे लागत असल्याने उत्पादन खर्चात बचत झाल्याचे शेतकऱ्याने सांगितले. तसेच या पद्धतीने एकरी उत्पादन २० क्विंटल घेतल्याचे सांगितले. यावेळी सोयाबीन पिकाची उगवण १०० टक्के झालेली असल्याने कृषीमंत्री यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी विभागीय कृषी सहसंचालक दशरथ तांभाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय राऊत, उपविभागीय कृषी अधिकारी जयवंत कवडे, तालुका कृषी अधिकारी हरिश्चंद्र धुमाळ, शेतकरी आदी उपस्थित होते.
0 Comments