10 हजार महिला कामगारांचा सोलापूर ते मंत्रालय पायी मोर्चा धडकणार- कॉ. आडम मास्तर
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (CITU) चे 17 वे सोलापूर जिल्हा अधिवेशन लाल बावटा कार्यालय, दत्तनगर येथे उत्साहात पार पडले. अधिवेशनाची सुरुवात कॉ नरसय्या आडम मास्तर यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली.
अधिवेशनाचे उद्घाटन राज्य CITU नेते व जिल्हा प्रभारी कॉ. वसंत पवार यांनी केले. आपल्या भाषणात त्यांनी केंद्र सरकारने 29 विविध कामगार कायद्यांचे चार श्रम संहितांमध्ये केलेले रूपांतर हे कामगार-विरोधी पाऊल असल्याचा आरोप केला.
ते म्हणाले, “नवीन श्रम संहितांत लेबर कोर्ट व लेबर ऑफिसची संकल्पनाच संपवण्यात आली आहे. 60 टक्क्यांहून अधिक असंघटित कामगारांवर या कायद्यांचा गंभीर परिणाम होणार आहे. कामगारांनी एकजुटीने या धोरणांविरोधात उभे राहणे अत्यंत आवश्यक आहे.”
ते पुढे म्हणाले की असंघटित क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षा व पेन्शन देण्यासाठी CITU ने सातत्याने लढा दिला असून कामगारांच्या निवाऱ्याचे स्वप्न साकार करण्यातही संघटना यशस्वी ठरली आहे.
26 नोव्हेंबर रोजी चार श्रम संहितांविरोधात देशभरात कामगार संघटना रस्त्यावर उतरणार असल्याची त्यांनी घोषणा केली.
अधिवेशनाचा अहवाल आणि कार्यवाही
CITU जिल्हा सचिव अॅड. एम.एच. शेख यांनी मागील तीन वर्षांचा राजकीय व संघटनात्मक अहवाल सादर केला. 25 प्रतिनिधींनी चर्चेत सहभाग घेतला. जिल्हा कोषाध्यक्ष कॉ. दीपक निकंबे यांनी आर्थिक अहवाल मांडला. अहवाल सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
शोकप्रस्ताव कॉ. विल्यम ससाणे यांनी मांडला.
कॉ नरसय्या आडम मास्तर, कॉ.व्यंकटेश कोंगारी,युसुफ शेख मेजर,नसीमा शेख, नलिनी ताई कलबुर्गी आदींनी अध्यक्षीय मंडळाचे काम पाहिले.
वृत्तांत लेखन समितीत दत्ता चव्हाण आणि किशोर मेहता यांनी काम पाहिले.

0 Comments