बचत गटामुळे अनेक महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी बनल्या - सीआरपी शीतल देशमुख
माढा (कटूसत्य वृत्त):- बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिलांना शासन व बँकेच्या विविध योजनांचा लाभ मिळवून दिला आहे.आर्थिक उपलब्धता झाल्याने अनेक महिला सदस्यांनी छोटे-छोटे व्यवसाय व कुटीरोद्योग सुरू केले आहेत.ते उत्कृष्ट पद्धतीने चालू आहेत त्या माध्यमातून अर्थार्जन होत आहे त्यामुळे बचत गटाच्या अनेक महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी बनल्या आहेत असे प्रतिपादन महिला बचत गटाच्या सीआरपी शीतल निरंजन देशमुख यांनी केले आहे.
त्या मानेगाव ता.माढा येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत व्यवस्थापक अवधूत देशमुख व सलोनी जंगले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित महिला बचत गटाच्या बैठकीत बोलत होत्या.
पुढे सीआरपी शीतल देशमुख यांनी सांगितले की,मानेगाव व परिसरातील गावांमध्ये सुमारे 75 हून अधिक महिला बचत गट सक्षमपणे सुरू आहेत. बचत गटाच्या महिला अनेक छोटी-छोटी व जीवनावश्यक वस्तूंची उत्पादने घेत आहेत.ती उत्पादने विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ आवश्यक आहे यासाठी शासनाने प्रयत्न केला पाहिजे.बचत गटाच्या महिलांनी आपल्या मुलांना चांगले व दर्जेदार शिक्षण देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.वाईट व्यसनाच्या व मोबाईलच्या आहारी मुले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी विविध बचत गटाची सर्व कागदपत्रे व वार्षिक ऑडिटची तपासणी सीआरपी शितल देशमुख यांनी करून पदाधिकारी व सदस्यांना सूचना देत मार्गदर्शन केले.
यावेळी बचत गटाच्या सीआरपी रोहिणी भोगे उद्योगसखी मोहिनी पारडे,सुरेखा आवारे, दैवशाला ताटे,भारती शिंदे, सुमिता गिरी,लक्ष्मी भारती,गंगा कुंभार,छबुबाई ताटे,रुक्मिणी वाघमारे,जयश्री ताटे,कुसुम ताटे,शकुंतला कदम,शशिकला कदम यांच्यासह बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.

No comments:
Post a Comment