जिज्ञासा' असेल तरच पुढची पिढी सक्षम -बानगुडे-पाटील
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- भारत हा जगातील सर्वात तरुणांचा देश आहे आणि या संधीचे सोनं करायचे असेल तर उद्याची पिढी सक्षम असले पाहिजे आणि ही पिढी सक्षम, ज्ञानवंत, नैतिक मुल्यावर चालणारी, विवेकी, संस्कारीत बनवायची असेल तर नव्या पिढीमध्ये जिज्ञासा नावाचा गुण असले पाहिजे असे प्रतिपादन प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांनी केले. श्री वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजींच्या ६८ व्या पुण्यतिथीनिमित्त श्री वीरतपस्वी शिक्षण संकुल, एम.आय.डी.सी., येथे आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत दुसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते. ‘चला नवी पिढी घडवू या' हा त्यांचा व्याख्यानाचा विषय होता. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महास्वामीजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पुढे बोलताना बानगुडे-पाटील म्हणाले, जी माणसं मनाला पराभूत करतात ती माणसं रणांगणात जिंकू शकत नाहीत आणि जी माणसं मनाला जिंकतात ती माणसं रणांगणात कधीही पराभूत होऊ शकत नाहीत. रणांगण जिंकायचं असेल तर पहिल्यांदा मन जिंकणे महत्वाचे आहे. वर्धमान महावीरांनी एकही लढाई केली नाही. तरीही त्यांना आपण महावीर म्हणतो. जो रण जिंकतो तो वीर आणि जो मन जिंकतो तो महावीर असे ते म्हणाले. वेळ कोणाला हातात पकडता येत नाही, साठवता येत नाही, वाचविता येत नाही म्हणून वेळ ज्या वेळेला हातात येतो त्या क्षणी त्या संधीचं सोनं करता आला पाहिजे म्हणून नव्या पिढीला वेळेचे महत्व समजावून सांगितलं पाहिजे. परिस्थिती माणसाला घडवत नाही आणि बिघडवतही नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो हे त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे उदाहरण देऊन पटवून दिले. उद्याची पिढी कृतिशील बनवायची असेल तर मुलांच्या चुका शोधण्यापेक्षा त्याच्या गुणांचे कौतुक करा दररोज दोन तास मैदानामध्ये खेळण्यासाठी वेळ द्या, जिवनात यशस्वी झाला तर नेतृत्व करा अपयशी झाला तर मार्गदर्शन करा असे मौलिक सल्ले त्यांनी शेवटी दिले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नंदकुमार धाये यांनी केले. वक्त्याचे व्याख्यान चालू असताना श्री भगवती गौरीमाता प्रशालेतील कला शिक्षक संजय पाटु यांनी वक्त्यांचे फोटो अतिशय सुंदर रितीने काढले. त्यांच्या या कलेचे उपस्थित श्रोत्यांनी कौतूक केले.