उजनीतून पाणी सोडण्यासंबंधी उपमुख्यमंत्री अजित पवार सकारात्मक
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेटून व सविस्तर चर्चा करून उजनी धरणातून कालवा, बोगदा, सीना माढा व दहीगाव उपसा सिंचन योजनेद्वारे शेतीसाठी पाणी सोडण्याचा सकारात्मक निर्णय येत्या दोन-तीन दिवसात निश्चित घेतला जाईल असे ठाम आश्वासन उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी दिले असल्याची माहिती आमदार बबनदादा शिंदे यांनी दिली आहे.
वृत्तांत असा की सध्या सोलापूर जिल्ह्यात सर्वत्र अवर्षणग्रस्त परिस्थिती असून उजनी धरण विसर्ग स्रोतावर अवलंबून असलेल्या लाखो एकर लाभक्षेत्रातील ऊस, फळबागा चारावैरण अशी उभी पिके पाण्याअभावी जळून जाऊ लागली आहेत व शेतकरी प्रचंड धास्तावलेला आहे. सध्या उजनी धरणात 14 टक्के उपयुक्त पाणी असून 7. 22 टीएमसी पाणीसाठा तयार झालेला आहे. आगामी दोन ते अडीच महिने च्या पावसाळ्यात धरणात आणखीन ज्यादा पाणी येईल तेव्हा येईल परंतु सोलापूर जिल्ह्यासाठी कालवा, भीमा- सीना जोड कालवा (बोगदा) सीना माढा व दहिगाव उपसा सिंचन योजना याद्वारे तातडीने पाणी सोडून उभ्या पिकांना जीवदान मिळावे म्हणून आमदार बबनदादा शिंदे आमदार संजय मामा शिंदे आमदार यशवंत माने माजी आमदार राजनजी पाटील कल्याण काळे आदी मान्यवरांनी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची मुंबईमध्ये भेट घेऊन त्याला जिल्ह्यातील शेती पिकांच्या भीषण वस्तुस्थिती विषयी निवेदन दिले व उजनीतून कालवा, बोगदा ,सिना माढा व दहीगाव सिंचन योजनेतून तातडीने पाणी सोडून लाखो एकरातील पाण्याअभावी जळून चाललेल्या उभ्या पिकांना जीवदान मिळवून द्यावे अशी आग्रही मागणी केली व पाणी सोडावेच लागेल म्हणून नामदार अजित दादा पवार यांना साकडे घातले, याप्रसंगी सहकार मंत्री नामदार दिलीप वळसे पाटील उपस्थित होते.
पाण्यासाठीच्या रास्त मागणी विषयी नामदार अजितदादा पवार म्हणाले की मी मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तथा जल संपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा करून येत्या दोन-तीन दिवसात उजनीतून पाणी सोडण्याविषयी सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आमदार बबनदादा शिंदे यांचे सहित इतर सर्व निवेदन करत्यांना आश्वासित केले आहे.

No comments:
Post a Comment