महावितरणने वीजबील वसूली त्वरित थांबवावी अन्यथा रस्त्यावर उतरू : मोहसिन शेख

अकलूज (कटुसत्य. वृत्त.): राज्यासह देशभरात कोरोना संक्रमण वाढत असताना संपूर्ण राज्यात लाॅकडाऊन करण्यात आले होते. १८ मार्च २०२० पासून सुरू झालेले लाॅकडाऊनने ऐन उन्हाळा-पावसाळा असे दोन ॠतू पार करत सामान्यांची आर्थिक बाजूने कंबर मोडली. अशांतच बचत गट हप्ते,खासगी बॅंकाकडून हप्तासाठी तगादा यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेकांचे उदरनिर्वाह करण्याचे साधन ठप्प असताना राज्य सरकारकडून ईएमआय हप्तास ऑगस्ट पर्यंत वसूलीस स्थगिती दिली ; परंतु सहाहून अधिक महिन्यांचा व्याज व दंडासहित वसुली मात्र सध्या जाचक अटीतून होत आहे.
दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारने भरमसाट वीजबील वाढीतून जनतेला दिलासा देण्यासाठी दिवाळीच्या मुहूर्तावर गोड बातमी देण्याचे गाजर महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दाखवले .परंतु अद्यापही सरकारने दिलेला शब्द पाळलेला नाही उलटपक्षी सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात अकलूज महावितरण कंपनीच्या कार्यालयाकडून जनतेस वेठीस धरत " वीजबील भरा अन्यथा वीजपुरवठा खंडीत करू " अशी दमदाटी अधिकारी करत आहेत.सरकारने नव्या वर्षाच्या सुरुवातीस यांवर तोडगा नाही काढला तर रस्त्यावर उतरून जन आंदोलन छेडण्यात येईल असे एम.आय.एम.चे सांगोला विधानसभा निरीक्षक मोहसिन शेख यांनी यावेळी राज्य सरकारला इशारा दिला.
0 Comments