कुर्डुवाडी नगरपरिषद निवडणुकीत नागरिकांचा बहिष्काराचा सूर! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, November 14, 2025

कुर्डुवाडी नगरपरिषद निवडणुकीत नागरिकांचा बहिष्काराचा सूर!

 कुर्डुवाडी नगरपरिषद निवडणुकीत नागरिकांचा बहिष्काराचा सूर!



नागरी सुविधा अभावी जनतेचा संताप — भ्रष्टाचार, स्वार्थी राजकारण आणि नेत्यांच्या निष्क्रियतेवर ताशेरे


कुर्डुवाडी (अरुण कोरे) – कुर्डुवाडी नगरपरिषद निवडणुका घोषित होऊन पंधरा दिवस उलटले, परंतु निवडणूक कार्यक्रमानुसार अर्ज भरण्याचे चार दिवस संपूनही अद्याप एकही उमेदवार अर्ज दाखल करण्यास पुढे आला नाही. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड निरुत्साह आणि नाराजीचे वातावरण असून, अनेक वार्डांतून मतदानावर बहिष्कार घालण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.


शहरातील रस्ते, गटारे, पिण्याचे पाणी, स्वच्छता, ड्रेनेज आदी मूलभूत सुविधांची दयनीय अवस्था गेल्या दहा वर्षांपासून कायम आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासन, नगरसेवक आणि नगराध्यक्षांनी दुर्लक्षच केले. उलट लाखो रुपयांचा निधी कामांच्या नावाखाली खर्च दाखवून गप्प बसण्यात आला, असा आरोप नागरिकांनी केला आहे.


प्रभाग ३ आणि ४ मध्ये तीव्र असंतोष


काडादी चाळ, शारदा हाऊसिंग सोसायटी (शिक्षक कॉलनी), सिद्धेश्वर नगर, जिजामाता नगर, मार्केट यार्ड, टेंभुर्णी रोड आदी भागांतील नागरिक मूलभूत सोयीसुविधांच्या अभावाने हैराण झाले आहेत. “कामे कुठे गेली? निधी कुठे गेला? आम्ही का मतदान करावे?” — असा थेट सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.


नेत्यांच्या ‘फार्स’ मुलाखतींवर जनतेचा संताप


गेल्या शनिवारी आणि रविवारी सर्व पक्षांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीचा फार्स केला, मात्र चार दिवस उलटूनही अंतिम उमेदवार जाहीर झाला नाही. अनेकांनी एकाहून अधिक वार्डातून आणि विविध पक्षांतून तिकीटाची मागणी केल्याने पक्षांत संभ्रम निर्माण झाला आहे. “स्वबळावर लढण्याच्या घोषणा एकीकडे आणि गुप्त सेटलमेंट दुसरीकडे” अशी जनतेत चर्चा आहे.


भ्रष्टाचार, संधिसाधू वृत्ती आणि गुन्हेगारी राजकारणावर बोट


तालुक्याच्या राजकारणातील स्वार्थी, संधिसाधू वृत्ती, अभद्र युती, जातीय समीकरणे आणि गुन्हेगारीला राजाश्रय या सर्व गोष्टींनी नागरिकांचा विश्वास डळमळीत केला आहे. त्यामुळेच यावेळी “मतदानावर बहिष्कार” हा एकमेव लोकशाही मार्ग नागरिकांकडून वापरला जाईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.


७१ वर्षांच्या इतिहासातील पहिलीच अशी स्थिती


कुर्डुवाडी नगरपरिषदेच्या ७१ वर्षांच्या इतिहासात एवढा निरुत्साह आणि स्मशान शांततेचा माहौल कधीच पाहिला गेला नव्हता, असे जुन्या जाणत्यांचे म्हणणे आहे. काही मोजक्या इच्छुकांनीच घराघरांत प्रचार सुरू केला असला तरी नागरिकांचा उदासीनतेचा सूर मात्र वाढतच आहे.



---


नागरिकांचा सवाल थेट आणि स्पष्ट — “विकास झाला कुठे? कामे दिसत नाहीत, तर मतदान कशाला करायचे?”

कुर्डुवाडीतील ही जनतेची भूमिका आगामी निवडणुकीत सर्व राजकीय पक्षांसाठी धोक्याची घंटा ठरत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages