पंजाबने दिले ₹५०,०००/- मात्र महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची चेष्टा?
मुंबई (कटूसत्य वृत्त):- राज्यातील अनेक भागांमध्ये झालेल्या सततच्या पावसामुळे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. सोलापूर, मराठवाडा, विदर्भ, कोकणसह अनेक जिल्ह्यांत ओल्या दुष्काळाचे संकट उभे राहिले असून, शेतमालाचे संपूर्ण नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत मदतीच्या घोषणांमध्येही मोठा भेदभाव दिसून येत आहे, असा आरोप आता सोशल मीडियावर जोरात होत आहे.
पंजाब सरकारने शेतकऱ्यांसाठी हेक्टरी ₹५०,००० ची भरपाई जाहीर केली आहे, तर महाराष्ट्र सरकारने केवळ ₹८,००० इतकी मदत जाहीर करून शेतकऱ्यांच्या भावनांची चेष्टा केली असल्याची तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
देशातील सर्वात श्रीमंत राज्य असलेल्या महाराष्ट्राकडून अशी तुटपुंजी मदत ही दुर्दैवी बाब आहे. जे राज्य देशाच्या तिजोरीत मोठा वाटा उचलतं, तिथल्या शेतकऱ्यांना अशा क्षणी योग्य न्याय मिळायला हवा होता," असे मत अनेक नेत्यांनी आणि अभ्यासकांनी व्यक्त केलं आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणसिस यांनी राज्यातील आमदार, खासदार आणि मंत्र्यांनी एका महिन्याचा पगार पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी द्यावा, असे आवाहन केले. मात्र, सोशल मीडियावर यावरही जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत.
"एका महिन्याचा पगार देण्यापेक्षा, आमदार, खासदार आणि मंत्र्यांनी एका महिन्याच्या 'टक्केवारी'तून फक्त १% जरी दिला, तरी राज्याच्या तिजोरीपेक्षा जास्त रक्कम जमा होईल," अशी टीका सोशल मीडियावर करण्यात येत आहे. ही टीका भ्रष्टाचार आणि कमिशनखोरीवर मार्मिक भाष्य करत आहे.
शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी केवळ पंचनामे, प्रतीक्षा आणि आश्वासने नव्हे, तर तात्काळ आणि पुरेशी आर्थिक मदत दिली जावी, अशी जोरदार मागणी राज्यभरातून होत आहे. पंजाब सरकारचा आदर्श समोर असताना, महाराष्ट्र सरकारनेही शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ठोस आणि निर्णायक पाऊल उचलावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
No comments:
Post a Comment