टेंभूतून रब्बी, उन्हाळी हंगामासाठी उचलले ११ टीएमसी पाणी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- गतवर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असला तरी, डिसेंबर महिन्यापासूनच पाण्याची झळ बसू लागली. ही झळ कमी करण्यासाठी टेंभू उपसा सिंचन योजनेचे रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी आवर्तन सुरु करुन लाभ क्षेत्रातील पिकांना पाणी उपलब्ध करुन दिले.
टेंभू उपसा सिंचन योजना तब्बल १७२ दिवस (पाच महिने २० दिवस) अखंड सुरु होती. या कालावधीत ११ टीएमसी पाणी उचलून सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाल्याने मोठा दिलासा मिळाला.
जिल्ह्यात गतवर्षी दुष्काळी पट्ट्यातील तालुक्यासह इतर तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. परंतू नोव्हेबर-डिसेंबर महिन्यापासून दुष्काळी भागासह टेंभू उपसा सिंचन योजनेच्या लाभ क्षेत्रात पाणी टंचाईची झळ सुरु झाली. त्यामुळे पिके पाण्याअभावी कोमेजू लागली.
यामुळे लाभक्षेत्रातील शेतकरी वर्गातून टेंभू योजनेचे आवर्तन सुरू करण्याची मागणी झाली. १५ डिसेंबर २०२५ रोजी रब्बी व उन्हाळी हंगामासाठी आवर्तन सुरू करण्यात आले. सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यातील शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला. लाभक्षेत्रातील ७० हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले. परिणामी ऐन दुष्काळात मोठा दिलासा मिळाल्याने 'टेंभू'च्या आवर्तनाने कायम दुष्काळी टापूत दुष्काळ सुसह्य झाला.
यावर्षी उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने पाण्याची मागणी वाढली होती. त्यामुळे आवर्तन उन्हाळा व टंचाईची परिस्थिती संपेपर्यंत अखेरपर्यंत सुरू ठेवण्यात आले. सर्वत्र टंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. या परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्व सिंचन योजना सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे टेंभू योजनेचे आवर्तन १५ डिसेंबर २०२५ रोजी सुरू करण्यात आले. ते तब्बल १७२ दिवस सुरू ठेवले गेले.
टेंभू योजनेच्या उन्हाळी आर्वतनामुळे सांगली,सातारा,सोलापूर जिल्ह्यातील ७ तालुक्यांच्या लाभक्षेत्रातील दुष्काळी टापूतील सुमारे २२१ गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकालात निघाला आहे.या पाण्याने कऱ्हाड तालुक्यातील ६०० हेक्टर, कडेगावातील ९ हजार ९ हजार ३२५ हेक्टर, खानापुरातील १८ हजार ९७५ हेक्टर, तासगावातील ७ हजार ७०० हेक्टर, तर आटपाडी, कवठेमहांकाळ व सोलापूर जिल्ह्यातील सांगोला अशा सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील एकूण ८० हजार ४७२ लाभक्षेत्रापैंकी ७० हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले. त्यामुळे ऐन दुष्काळातही येथे दुष्काळाची तीव्रता जाणवली नाही.
रब्बी, उन्हाळी हंगामासाठी सुरू असलेले टेंभू सिंचन योजनेचे आवर्तन जूनच्या पहिल्या बंद झाले. हे आवर्तन तब्बल १७२ दिवस (पाच महिने, २० दिवस) अखंड सुरू होते. यासाठी कृष्णा नदीतून ११ टीएमसी पाणी उचलण्यात आले.

No comments:
Post a Comment