सोलापुरात तांत्रिक कौशल्यांचा महाकुंभ! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, March 5, 2026

सोलापुरात तांत्रिक कौशल्यांचा महाकुंभ!

 सोलापुरात तांत्रिक कौशल्यांचा महाकुंभ! 

७ मार्चला 'टेकनोक्रेस्ट २०२६' चा थरार; दीड लाखांची बक्षिसे
सोलापूर(कटूसत्य वृत्त):-शहरातील नामांकित शैक्षणिक संस्था 'भारतरत्न इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग'च्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी "टेकनोक्रेस्ट २०२६" या भव्य राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ७ मार्च रोजी होणाऱ्या या महोत्सवासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन नोंदणी प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाली असून, देशभरातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला मिळणार हक्काचे व्यासपीठ
या महोत्सवाच्या माध्यमातून राज्यातील अभियांत्रिकी (Degree), पदविका (Diploma) तसेच विज्ञान (Science) क्षेत्रातील विद्यार्थ्यांना त्यांचे तांत्रिक कौशल्य आणि नाविन्यपूर्ण कल्पना सादर करण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येत आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नसून, विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिकल नॉलेजवर भर द्यावा, या उद्देशाने या महोत्सवाची व्याप्ती वाढवण्यात आली आहे.
या एक दिवसीय तांत्रिक कुंभात वैविध्यपूर्ण स्पर्धांची मेजवानी असणार आहे. यामध्ये प्रामुख्याने या नॅशनल हॅकाथॉन, प्रोजेक्ट आयडिया कॉम्पिटिशन, रोबोटिक्स व ब्रिज मेकिंग, पेपर व पोस्टर प्रेझेंटेशन, क्विज कॉम्पिटिशन व रील मेकिंग, मॉडेल एक्झिबिशन असे या स्पर्धेच्या विषयाचे  आयोजन करण्यात आले आहे 

या महोत्सवात महाराष्ट्रसह कर्नाटक, तेलंगणा आणि देशातील विविध राज्यांमधून सुमारे १५०० विद्यार्थी सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विजेत्या स्पर्धकांसाठी एकूण १ लाख ५० हजार रुपयांची भरघोस रोख पारितोषिके आणि सन्मानचिन्हे देण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, सहभागी होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला 'राष्ट्रीय स्तरावरील सहभागाचे प्रमाणपत्र' देऊन गौरविण्यात येणार आहे.
'विकसित भारत' घडवण्याचा मानस
पत्रकार परिषदेत बोलताना संस्थेचे प्राचार्य डॉ. अनिल देशमाने म्हणाले की, "तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून शिकण्याची संधी मिळावी, हाच आमचा मुख्य हेतू आहे."
संस्थेचे अध्यक्ष इंजि. रवींद्रजी गायकवाड आणि सचिव श्रीमती अनामिका गायकवाड यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की, "हा केवळ एक कार्यक्रम नसून, भविष्यातील तंत्रज्ञांना एकत्र आणणारा एक विचार आहे. तंत्रज्ञान हे देशाच्या प्रगतीचे मुख्य इंजिन आहे. 'विकसित भारत' घडवण्यासाठी लागणारे तांत्रिक कौशल्य विद्यार्थ्यांना देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. यावर्षीचा महोत्सव मागील वर्षांच्या तुलनेत अधिक भव्य आणि नाविन्यपूर्ण असेल."
कार्यक्रमाचे उद्घाटन ७ मार्च रोजी सकाळी १० वाजता कॉलेज कॅम्पसमध्ये होणार आहे. महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी समन्वयक प्रा. विजयकुमार कोळकुरे, नोंदणी प्रमुख प्रा. अमित वडवेराव यांच्यासह सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक आणि विद्यार्थी प्रतिनिधी अहोरात्र परिश्रम घेत आहेत.
 राज्यातील जास्तीत जास्त अभियांत्रिकी आणि विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी या 'तांत्रिक महाकुंभात' सहभागी होऊन आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करावे, असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.अशी माहिती प्राचार्य.डॉ अनिल देशमाने, यांनी दिली आहे, यावेळी प्रा. विजय कोळकुरे, प्रा. अझरुद्दीन पेरमपल्ली, प्रा.अमित वडवेराव, प्रा.सौरभ देशमाने  यावेळी उपस्थित होते..

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages