मंदिर समितीकडून दर्शन रांगेचे सूक्ष्म नियोजन- राजेंद्र शेळके
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- आषाढी यात्रेचा मुख्य सोहळा दि. 06 जुलै रोजी संपन्न होत आहे. त्यानिमित्ताने श्रींच्या दर्शनरांगेत भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. यंदा मंदिर समितीच्या वतीने दर्शनरांगेचे सूक्ष्म नियोजन करून अत्याधुनिक पध्दतीची दर्शनरांग तयार केली असल्याने दर्शनरांगेतील भाविकांचा प्रवास सुखकर होऊन जलद व सुलभ दर्शन होत असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगीतले.
संपूर्ण दर्शनरांगेत सीसीटीव्ही कॅमेरे, दिशादर्शक व माहितीचे फलक, भक्तीसंगीतासाठी अत्याधुनिक साऊंड सिस्टीम, लाईव्ह दर्शनासाठी एलईडी व्हॅन व एलईडी टिव्ही, हरवले सापडले केंद्र, फॅब्रिकेटड शौचालये व साफसफाईसाठी जेटींग - सक्षण मशिन, उपजिल्हा रूग्णालय व तालुका वैद्यकीय अधिकारी यांचेमार्फत आयसीयू, प्रथमोपचार केंद्र, स्वच्छता व्यवस्थेकामी पुरेसा कर्मचारी, अन्नदानेश्वर महाराज व जळगांव सेवा समिती मार्फत 24 तास अन्नदान, मंदिर समितीमार्फत मिनरल वॉटर, चहा, तांदळाची व शाबुदाणा खिचडी, सार्वजनिक सुचना प्रसारण प्रणाली, विश्रांती कक्ष, बसण्याची सुविधा, आपत्कालिन व्यवस्थेसाठी आपत्कालिन मार्ग, अग्निशमन व्यवस्था, आपत्कालीन प्रतिसाद केंद्र, अत्याधुनिक पध्दतीची विद्युत व्यवस्था, फॅन – कुलर व्यवस्था, मार्गावरील अडथळा दुर करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपाची उड्डाणपुले उभारण्यात आली आहेत.
यंदा कायमस्वरूपी 4 पत्राशेडच्या शेजारी 100 x 450 फुटाचे अत्याधुनिक एक सलग तात्पुरते पत्राशेड उभारण्यात आले आहे. त्याची उंची 16 फूट असून, स्ट्रक्चर 33 पिलरचे उभे आहे व त्यावर 60 फूट लांबीची लोखंडी कैची उभी केली आहे. यामध्ये 100x450x16 फुटात एकच शेड तयार झाले असून एकूण पूर्वीचे 8 पत्राशेड कव्हर झाले आहेत. त्याची उंची 16 फुट व सलग शेड असल्याने आतमध्ये हवा खेळती राहत असून, दर्शनरांग देखील जलद व द्रुतगतीने चालत आहे. याशिवाय, सलग शेड असल्याने भाविकांचे पावसापासून संरक्षण होत आहे तसेच आपत्कालिन दृष्टीने शेडच्या मागील व पुढील बाजूस पुरेसा जागा देखील उपलब्ध ठेवण्यात आली आहे. तसेच या भागातील पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी अंडरग्राऊंड स्ट्रॉम वॉटर पाईपलाईन केली असल्यामुळे पावसाचे पाणी इतरत्र वाहत नाही. संपूर्ण बॅरीकेटींग व पत्राशेडचे तांत्रिकदृष्ट्या योग्य असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग पंढरपूर यांचेकडून प्रमाणपत्र घेण्यात आले आहे.
याशिवाय, 24 तास दर्शनाची वेळ, भाविकांच्या हस्ते होणा-या पुजा बंद ठेवणे, घुसखोरी रोखणे, व्हिआयपी व्यक्तींच्या दर्शनावर निर्बंध, मॅन काऊटींग मशिन, अनुभवी कमांडोज नियुक्ती व इतर अनुषंगीक उपाययोजना करण्यात आल्याने व दर्शनरांगेचे सुक्ष्म नियोजन करून दर्शनरांग जलद व द्रुतगतीने चालून भाविकांचा दर्शनरांगेतील प्रवास सुखकर होऊन कमीत कमी वेळेत भाविकांना श्रींचे दर्शन घडत असल्याचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी यावेळी सांगीतले.
0 Comments