पुनर्मूल्यांकनानंतर महात्मा फुले विद्यालयाच्या आद्या शिंदे हिला १०० टक्के गुण; सोलापूर जिल्ह्यात ठरली एकमेव विद्यार्थिनी
टेंभुर्णी(कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या वतीने मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत टेंभुर्णी येथील महात्मा फुले विद्यालयाची विद्यार्थिनी आद्या सिद्धेश्वर शिंदे हिने पुनर्मूल्यांकनानंतर तब्बल १०० टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात १०० टक्के गुण मिळवणारी ती एकमेव विद्यार्थिनी ठरली आहे.
प्रारंभी जाहीर झालेल्या निकालात आद्याला ९९.४० टक्के गुण मिळाले होते. मात्र गणित आणि समाजशास्त्र या विषयांमध्ये अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याचे लक्षात आल्यानंतर विद्यार्थिनी व पालकांनी पुणे विभागीय मंडळाकडे पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केला होता.
त्यावर संबंधित विषयांच्या उत्तरपत्रिकांची फेरतपासणी करण्यात आली. बोर्डाने नियुक्त केलेल्या समितीने उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करून योग्य उत्तरांना अतिरिक्त गुण देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आद्याला गणित विषयात १०० पैकी १०० गुण, तर समाजशास्त्र विषयात ४ गुणांची वाढ देण्यात आली. या सुधारित गुणांमुळे तिचे एकूण गुण १०० टक्क्यांवर पोहोचले.
आद्याच्या या यशामुळे महात्मा फुले विद्यालयाने दहावी बोर्ड परीक्षेत सलग पाचव्या वर्षी १०० टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची परंपरा कायम ठेवली आहे.
या यशामागे तिच्या पालकांचे प्रोत्साहन तसेच शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. शिक्षक नारायण भानवसे, विजय यादव, शरद सातव, विनोद जाधव, गगन गोडसे, योगेश शिंदे, अनंत घळके, सचिन खडके आणि सोहम व्यवहारे यांनी तिला मोलाचे मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे आद्याने शाळेबाहेरील कोणत्याही कोचिंग क्लासचे मार्गदर्शन घेतले नव्हते.
तिच्या या यशाबद्दल टेंभुर्णी व परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून पालकमंत्री मा. ना. जयकुमार गोरे, आमदार अभिजीत आबा पाटील, जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजीत भैय्या शिंदे, जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती अमृताताई वाघे, संस्थेचे अध्यक्ष नारायण भानवसे, प्राचार्य विजय यादव तसेच मुख्याध्यापक शोएब बागवान यांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत

No comments:
Post a Comment