पुणे विधानभवनावर बसपाचा 'विराट आक्रोश मोर्चा'



तात्काळ मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
पुणे, (कटुसत्य वृत्त): बहुजन समाज पार्टी, पुणे शहर व जिल्ह्याच्या वतीने विविध मागण्यांसंबंधी शुक्रवारी पुणे विधानभवनावर 'विराट आक्रोश मोर्चा' काढण्यात आला.आंदोलनानिमित्त एकत्रित झालेल्या शेकडो कॅडरच्या हातातील झेंड्यांमुळे पुणे शहर 'निळं' झाले होते.सकाळी पुणे स्टेशन जवळील महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करीत मोर्चाला सुरूवात करण्यात आली होती.बसपाचे प्रदेश प्रभारी मा.नितीन सिंह साहेब, मा.प्रदेश प्रभारी प्रमोद रैना साहेब यांच्या मार्गदर्शनात प्रदेशाध्यक्ष मा.अँड.संदीप ताजने साहेब, प्रदेश प्रभारी हुलगेश भाई चलवादी यांच्या नेतृत्वात या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.दुपारी बसपाच्या शिष्टमंडळाच्या वतीने पुणे विभागीय आयुक्तांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
पेट्रोल-डिझेलवरील कर कपात करण्यात आली असली तरी महागाईने जनता होरपळत आहे. गॅस चे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत.जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत.त्यामुळे यासर्व वस्तूंचे दर कमी करावे आणि महामगाईच्या दृष्टचक्रातून सत्ताधाऱ्यांनी 'सर्वजनांना' बाहेर काढावे,असे आवाहन यावेळी प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने साहेबांनी उपस्थितांना संबोधित करतांना केले. मध्यंतरी राजकीय फायद्यासाठी अतित्व शून्य राजकारण्यांकडून राज्यभरासह देशातील धार्मिक वातावरण कलुषीत करण्यासाठी 'भोंग्यां'चा मुद्दा काढण्यात आला होता. या 'राज'कारणामुळे देशभरातील एका विशिष्ट धर्मबांधवांमध्ये असुरक्षेची भावना आहे.धार्मिक द्वेष परसरवण्यासाठी हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता.त्यामुळे असे समाजविधातक मुद्दे उपस्थित करीत द्वेष पसरवणाणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी देखील यानिमित्ताने अँड.ताजने यांनी केली.
मोर्चात प्रदेश महासचिव मा.सुदीप गायकवाड, प्रदेश सचिव मा.भाऊ शिंदे, मा.अजित ठोकळे, मा.सुरेश गायकवाड,मा.सौ शीतलताई गायकवाड,बाळासाहेब आव्हारे,आप्पा साहेब लोकरे, जिल्हा प्रभारी रमेश अप्पा गायकवाड, मेहमूद जकाते, अशोक गायकवाड, संजय सेंगडे, बापू कुदळे, जिल्हा उपाध्यक्ष मा.धम्मदीप लगाडे, महिला जिल्हाध्यक्ष मा.निधी वैद्य, शहराध्यक्ष सुरेखा कांबळे, युवक आघाडी अध्यक्ष पुणे शहर सिद्धार्थ कांबळे प्रामुख्याने उपस्थित होते.
दलितांवर अन्याय करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करा-नितीन सिंह
पुरोगामी अशी ओळख असलेल्या महाराष्ट्रात दलितांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. गावोगावात दलितांविरोधात सुडाचे राजकारण केले जात आहे.अशात दलितांवर होणारे अन्यायाविरोधात प्रभावी पावले टाकत अत्याचार करणार्यांविरोधात तात्काळ कारवाई करण्याची मागणी यावेळी प्रदेश प्रभारी मा.नितीन सिंह यांच्यावतीने करण्यात आली. बहुजनांसह सर्वजनांच्या हितासाठी स्थापन झालेल्या बहुजन समाज पार्टीच्या सामाजिक विचारधारेनूसारच दलितांवरील अत्याचारात घट होवू शकते, असे सिंह म्हणाले. राज्यातील ओबीसी आरक्षण पुर्ववत करावे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मतपत्रिकेवर घेण्यात यावी, बेरोजगारी दूर करण्यासाठी १६ कोटी सरकारी नोकर भरती करावी अशी मागणी यावेळी त्यांनी केली.
तीव्र आंदोलन उभारणार-रैना
विविध मागण्यांसाठी प्रतिनिधित्व स्वरुपात शेकडो आंदोलक एकत्रित झाले होते. पंरतु, मागण्या लवकरात लवकर मान्य करण्यात आल्या नाही तर याहून ही मोठे आंदोलन उभारू असा सूचक इशारा यावेळी प्रदेश प्रभारी प्रमोद रैना यांनी दिला.बहुजन समाज पार्टीचा प्रत्येक कॅडरमध्ये समाजहिताच्या अनुषंगाने न्यायशील 'हत्ती'चे बळ आहे.समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत संघर्ष करण्यासाठी कॅडर सदैव तत्पर असतात. येत्या काळात बसपाची शक्ती सर्वांनाच दिसून येईल, असे प्रतिपादन रैना यांनी यावेळी केले.
बहुजनांच्या न्याय हक्कासाठी 'आक्रोश मोर्चा'-चलवादी
महागाईने होरपळणारे गोरगरीब, झोपडपट्टीधारक यांसह बेरोजगारांच्या न्याय हक्कासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता, अशी माहिती प्रदेश प्रभारी हुलगेशभाई चलवादी यांनी दिली.कंत्राटी कामगार कायदे रद्द करावे तसेच महार वतानांच्या जमिनी बळकवणार्या धनदांडग्यांपासून वतनाच्या जमिनी मुक्त करीत मूळ मालकांना देण्यासाठी शासनाने निर्णय करावा, झोपडपट्टीधारकांना ५०० चौरस फुटांचे घर द्यावे, उच्च न्यायालयाने मुस्लिमांना दिलेल्या ५% आरक्षणाची अंमलबजावणी करावी तसेच पुणे मनपामध्ये समान पाणी वाटप करीत शहराला टॅंकरमुक्त करण्याची मागणी चलवादी यांच्याकडून करण्यात आली.
0 Comments